(१) आकृती पूर्ण करा :

मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. ओळख नसली तरी. आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितेय? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशांतून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले.
असं आपल्याभोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने दहा झार्ड जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यांत जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले दहा झाडं, विचार करा. अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत; पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत. कावळा, कबुतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली, तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा पाच- सातच पाठ असतात. पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खाट्य असतं. झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्हीपण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही; पण झाडं मोठी झाली, तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल, तर गाडी आवश्यक आहे; पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत.
खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं; पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एकजण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल; पण तुमच्यापैकी एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात; पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्यदिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे.
मी एवढं सगळं सांगितलं, कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय. तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय; पण मी तुम्हांला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत; पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे, की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी रहा. जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हांला वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, होस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे कुणाला माहीत नसतं; पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. दहावीत कुणाचे गुण जास्त असणार कुणाचे कमी असणार; पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा !
2. आकलन कृती
(१) चौकटी पूर्ण करा :
| सामान्य व्यक्तीची श्रीमंती | देशाची श्रीमंती |
• ‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.


