उपरोक्त पंक्ती ‘जीवन गाणे’ या कवितेतून घेतली असून कवी ‘नितीन देशमुख’ निसर्गातील प्रत्येक घटक आपणांस काही मूल्ये व संस्कार शिकवित असतात हे सोदाहरण पटवून देत आहेत. आजच्या धावपळीच्या युगात संस्कारांची वानवा आहे. प्रसिद्धी आणि पैसा मुख्य ध्येय मानून मूल्ये गुंडाळून ठेवली जात आहेत.
जग भरकटलेले आहे. चांगल्या गोष्टींची घसरण होत चालली आहे. पण याही काळात तुळशीपुढे तेवत असलेल्या पणतीने मला शिकवले, तू असाच जळत रहा. प्रकाश देत रहा. अंधार, अज्ञान दूर सारत रहा. आजुबाजूला असलेल्या अनेक घटकांमधून बोध घेण्यासारखा आहे. मातीच्या पणतीने मला जळत रहायला, पेटत रहायला शिकवले. पणतीचे रुपक प्रस्तुत कवितेत वापरले असल्याने आशयसौंदर्य निर्माण झाले आहे.