Questions

कथालेखन : [5M]

Take a timed test

5 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 15 Marks
कथेचा उत्तरार्ध दिला असता पूर्वार्ध लिहा. कथेचा उत्तरार्ध.
      तो अंग झटकून उभा राहिला. तोंड वर करून कावळ्याकडे बघून म्हणाला, "कावळे दादा, कावळे दादा, अहो! किती दिवसांनी दर्शन दिलेत". कावळा गंमत म्हणून कोल्ह्याकडे कडे बघू लागला. तसा कोल्हा पुन्हा म्हणाला. "अहो कावळेदादा, काय तुझे रूप, किती छान-छान तुमचे पंख, किती बळकट तुमचे पाय, किती बाकदार, शानदार तुमची चोच आणि हो तुमचा गळा, तुमचा आवाज किती किती मधुर, किती गोड आहे. किती दिवसात तुमचं गाणं ऐकलं नाही! खरंच कावळेदादा, म्हणा ना एक सुंदरगाणे. कावळेदादा एक गाणं म्हण ना रे." कोल्हयाने पुन्हा पुन्हा विनंती केली. कावळा विचारात पडला. प्रथमच त्याची कोणी इतकी स्तुती केली होती. कावळा खूश झाला. कोल्हयाने ओळखले थोडी आणखी स्तुती केली तर कावळा नक्की तोंड उघडेल.
      कोल्ह्याने आता कावळ्याने गाणे गावे म्हणून हट्टच धरला. एवढी स्तुती ऐकून कावळ्यालाही राहवले नाही. त्याने गाणे म्हणण्यास सुरुवात केली आणि 'साऽऽरे' म्हणण्याच्या आधीच तोंडातला मासा खाली पडला. भुकेलेल्या कोल्हयाचे काम फत्ते झाले. त्याने तो मासा उचलला व खाऊन टाकला. कावळा बिचारा गातच होता. पण कोल्हा होता कुठे ते गाणे ऐकायला ! तो तर केव्हांचा पळून गेला होता दुसऱ्या मुर्खाच्या शोधात.
तात्पर्य : खोट्या स्तुतीला फसू नये. स्वार्थासाठी लबाड लोक खोटी स्तुती करतात. खोट्या स्तुतीवर विश्वास ठेवू नये.
शीर्षक: लबाड कोल्हा, मुर्ख कावळा.
Answer
कथेचा पूर्वार्ध खालीलप्रमाणे
     पंचवटीजवळ एक जंगल होते. या जंगलात एक कोल्हा राहत होता. दुसऱ्याच्या शिकारीवर ताव मारणे हा त्याचा उद्योग होता. साध्याभोळ्या प्राण्यांना गोड बोलून फसवणे व ठार मारणे हा त्याचा छंद होता. जंगलातील प्राण्यांना त्याचा स्वभाव कळला होता. आता सर्व प्राणी कोल्हह्यापासून चार हात लांब राहणे पसंत करीत.
     यामुळे एकदा काय झाले. कोल्हा दोन दिवस उपा- शी राहिला. त्याला शिकार मिळाली नाही. सगळे प्राणी सावध होते. कोल्हा दिसला की लांब राहत. त्याला दोन दिवसांत अन्नाचा एक कणही मिळाला नाही. आज काही झाले तरी शिकार करायचीच असे त्याने ठरविले. दिवसभर जंगलात शिकारीसाठी तो वणवण फिरला. वणवण भटकून थकल्यानंतर तो विश्रांतीसाठी नदीजवळच एका झाडाखाली बराच वेळ बसला नंतर त्याने वर पाहिले. एक कावळा तोंडात भला मोठा मासा घेऊन बसला होता. कावळा आता तो ताजा मासा खाणार आणि आपण उपाशीच राहणार काय करावे ? कसे करावे ? म्हणजे तो मासा आपल्याला मिळेल. तो विचार करू लागला आणि एकदम त्याला एक युक्ती सुचली सुद्धा.
View full question & answer
Question 25 Marks
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. दिलेली कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.
Image
Answer

लोभी माणूस

     याची भक्ती पाहून एके दिवशी परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला. परमेश्वराने त्याला दर्शन दिले आणि सांगितले, "माग तुला काय हवे ते?" परमेश्वराचे हे शब्द ऐकताच सोहनलालचा लोभीपणा जागृत झाला. आणि तो परमेश्वराला म्हणाला, "माझ्या झोळीत भरपूर सोन्याची नाणी टाक". परमेश्वराने त्याची मागणी मान्य करताना त्यास सांगितले, "नाणी जर जमिनीवर पडली तर त्याची माती होईल." लोभीपणामुळे सोहनलालने त्याकडे लक्ष दिले नाही.
     परमेश्वर सोहनलालच्या झोळीत सोन्याची नाणी टाकू लागला. हळूहळू संपूर्ण झोळी सोन्याच्या नाण्यांनी भरून गेली. तरीही सोहनलाल देवाला 'मला अजून सोन्याची नाणी दे', असे सांगत होता आणि अचानक सोन्याची नाणी झोळीत जास्त झाल्याने झोळी फाटली आणि सर्व नाणी जमिनीवर पडून त्यांची माती झाली. हे पाहताच सोहनलालला अतिशय दुःख झाले आणि त्याचवेळेला परमेश्वरही अंतर्धान पावले.

View full question & answer
Question 35 Marks
दिलेल्या शीर्षकावरून कथा तयार करा.
Answer

करावे तसे भरावे.

     सोनापूर गाव नावाप्रमाणेच सोन्यासारखे सुंदर होते. निसर्गाने जणू काही मुक्त हस्ताने सौंदर्य उधळले होते या गावावर. गावातून एक नदी वाहत होती. याच छोट्याशा गावात रामू नावाच्या एका शिंप्याचे दुकान होते.
     गावात एकदा सर्कस आली. सर्कशीतला हत्ती रोज नदीवर स्नानासाठी जाई. जाताना तो शिंप्याच्या दुकानापाशी थांबे. शिंपी त्याला रोज काही ना काही खायला देत असे. मग हत्तीसुद्धा खूश होऊन त्याला सोंडेने सलाम करीत असे.
     एके दिवशी, शिंप्याच्या मनात विचार आला की, आपण या हत्तीची गंमत करावी. नेहमीप्रमाणे हत्ती नदीवर जाताना शिंप्याच्या दुकानाजवळ आला. पण आज मात्र खाऊ देण्याऐवजी त्याने हत्तीच्या सोंडेला सुई टोचली. अरेरे! बिचारा हत्ती! वेदनेने कळवळला, पण आपले दुःख बिचाऱ्या मुक्या जनावराला व्यक्त करता येईना. तो तसाच पुढे नदीवर गेला. मनात मात्र शिंप्यावरचा राग धुसफुसत होता. त्यानेही रामूला धडा शिकविण्याचे ठरविले.
     आंघोळ करून झाल्यावर हत्तीला युक्ती सुचली. नदीजवळच एक घाणेरड्या पाण्याचे डबके होते. त्याने ते घाणेरडे पाणी आपल्या सोंडेत घेतले व तो शिंप्याच्या दुकानाजवळ परत आला. शिंपी कपड्यांचा पसारा काढून कपडे शिवत बसला होता. त्याने ते सोंडेतले घाणेरडे पाणी शिंप्याच्या दुकानातील सर्व कपड्यांवर उडवले. अशाप्रकारे त्याने शिंप्याला चांगलाच धडा शिकवला.

View full question & answer
Question 45 Marks
खाली दिलेल्या मुद्द्यांवरून कथा तयार करा. कथेला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहा.
मुद्दे : श्रीमंत म्हातारा -दोन नोकर - कोंबडा आरवला की म्हातारा उठे - नोकरांना उठवूणे काम करायला सांगे - नोकरांनी विचार करून कोंबड्याला मारणे - म्हाताऱ्याचे वेळी-अवेळी उठणे - नोकरांना उठवणे - नोकरांना पहिल्यापेक्षा जास्त काम - पश्चाताप तात्पर्य.
Answer

आळशी नोकर

     साताऱ्याजवळ पाटण तालुक्यात घडलेली गोष्ट. या गावात जयसिंगराव पाटील नावाचे श्रीमंत उद्योगपती राहत होते. त्यांचे वय बरेच झाले होते. खूप मेहनत करून त्यांनी अमाप संपत्ती जमा केली होती. त्यांच्याकडे दोन नोकर होते.
     जयसिंगरावांकडे एक कोंबडा होता. तो कोंबडा आरवला की ते उठत आणि नोकरांना उठवून काम करायला सांगत. दोन्ही नोकर अतिशय आळशी होते. पहाटे लवकर उठणाऱ्या कोंबड्याचा त्यांना अतिशय राग होता. पण करणार काय? मालकाची आज्ञा त्यांना पाळावीच लागे. या कोंबड्यालाच मारून टाकले तर पहाटे उठण्याचा त्रास तरी वाचेल असे त्यांना वाटले. पण मालकापुढे त्यांचे काहीच चालेना. त्यामुळे ते मालक घरात नसण्याच्या संधीची वाट पाहू लागले.
      नोकर ज्या संधीची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. ती वेळ आता जवळ आली होती. एके दिवशी जयसिंगराव काही कामानिमित्त पुण्याला गेले. दोन्ही नोकरांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेतला आणि कोंबड्याला मारून टाकले.
       जयसिंगराव परत आल्यानंतर त्यांना आपला कोंबडा कुठेच दिसला नाही. ते बेचैन झाले. त्यांना चिंता लागली की, आता आपल्याला पहाटे कोण उठवणार ? त्या चिंतेत त्यांना रात्री झोपही लागेना, त्यामुळे ते वेळी अवेळी उठत आणि नोकरांनाही उठवत आणि काम करायला लावत. कोंबडा असताना निदान ते पहाटे पाच वाजता तरी उठत, पण आता तर कधी दोन वाजता तर कधी तीन वाजताही जयसिंगराव उठत व नोकरांनाही उठवत. त्यामुळे नोकरांना पहिल्यापेक्षा जास्त काम करावे लागे. आता मात्र त्यांना आपल्या कृत्याचा खूप पश्चात्ताप झाला होता.

View full question & answer
Question 55 Marks
खालील शब्द गुंफून एक छानशी कथा तयार करा.
कथेला शीर्षक दया सिंह - उंदीर - शिकारी - जाळे.
Answer

परतफेड

     फार प्राचीन काळातील कथा आहे ही. अवंतिका नगरीच्या उत्तरेला ५ मैलावर घनदाट जंगल होते. या जंगलात सारे प्राणी, पशुपक्षी गुण्यागोविंदाने नांदत होते. जंगलाचा राजा सिंह ऐटीत इकडून तिकडे, तिकडून इकडे असा भटकत असे. तो खूप दयाळू व प्रेमळ होता. पोट भरलेले असताना उगाचच तो कुणाची शिकार करत नसे.
     एके दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर सिंह एका झाडाखाली सावलीत थोडा वेळ आरामात पहुडला होता. त्याचवेळी त्या झाडाच्या सावलीत आपल्या मित्रांबरोबर काही उंदीर पकडापकडी खेळत होते. त्यातला एक छोटा उंदीर झोपलेल्या सिंहाच्या अंगावर उड्या मारू लागला. त्यामुळे सिंहाची चांगलीच झोपमोड झाली. त्याने डोळे किलकिले करून पाहिले तर छोटासा उंदीर ! त्याने हळूच आपला पंजा पुढे केला आणि पटकन त्या उंदराला पकडले.
"आता तुला मी खाऊन टाकणार.", सिंह गरजला. प्रचंड घाबरलेला तो उंदीर म्हणाला, "म.....म. महाराज माफी असावी. मी चुकलो. मला माफ करा."
     "नाही, तू माझी झोपमोड केलीस. मी तूला जिवंत सोडणार नाही." सिंहाने उत्तर दिले.
     "महाराज, माझ्यावर उपकार करा. मी कधीतरी नक्कीच तुमची मदत करीन." घाबरलेला उंदीर पटकन बोलला. यावर सिंह जोरजोरात हसू लागला. पण त्याला उंदराची दया आली. हा छोटासा उंदीर आपल्याला काय मदत करणार? असा विचार करतच सिंहाने त्याला सोडून दिले आणि पुन्हा तो झोपला.
      दुसऱ्याच दिवशी झुडुपात लावलेल्या शिकाऱ्याच्या जाळ्याकडे सिंहाचे लक्षच गेले नाही. लपून बसण्यासाठी तो तेथे गेला आणि अलगद जाळ्यामध्ये अडकला. त्याने सुटका करून घेण्यासाठी खूप धडपड केली, पण व्यर्थ ! तो आणखीन त्या जाळ्यामध्ये अडकला. शेवटी तो सिंह ओरडू लागला. त्याचे ते ओरडणे त्या छोट्या उंदराने ऐकले आणि धावतच तो तेथे पोहोचला. आपल्याला जीवनदान देणारा सिंह आता शिकाऱ्याकडून पकडला जाणार हे पाहताच तो मदतीसाठी धावला. त्याने आपल्या दातांनी भराभर ते जाळे कुरतडायला सुरुवात केली. पाच ते सात मिनिटांत त्याने ते जाळे तोडून सिंहाला मुक्त केले. त्या छोट्याशा उंदराची ती मदत पाहून सिंहाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.

View full question & answer