आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याच्या द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे 'वृष्टी' होय. ही वृष्टी विविध रूपात होते. त्यांपैकी दव, दहिवर, हिम, पाऊस, धुके व गारा ही वृष्टीची प्रमुख रूपे आहे.
पृथ्वीवर होणारी ही वृष्टी सर्वत्र सारखी नसते. तसेच या वृष्टीचे बरे-वाईट परिणामही दिसून येतात. वृष्टीचे प्रमुख परिणाम पुढीलप्रमाणे आहेत :
(१) वृष्टीमुळे पृथ्वीवर सर्वत्र जल (पाणी) उपलब्ध होते. म्हणजेच वृष्टी हा पृथ्वीवर पाण्याचा एकमेव स्रोत आहे.
(२) अतिवृष्टी तसेच कमी वृष्टी झाल्यास ते हानिकारक असते.
(३) अतिवृष्टीमुळे पूर महापूर येतात, म्हणजे ओला दुष्काळ पडतो. त्यामुळे जीवित व वित्तहानी होते.
(४) कमी वृष्टीमुळे अवर्षण म्हणजे कोरड्या दुष्काळाची स्थिती उद्भवते. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता जाणवते, शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची होते, अन्नधान्याची आयात करावी लागते आणि या सर्वांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो.
(५) भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान असल्याने ती पर्यायाने पावसावर (वृष्टीवर) अवलंबून आहे. योग्य वेळी, योग्य पावसामुळे शेतीचे उत्पादन वाढते, तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. भारतातील पाऊस अनियमित आहे.
(६) अतिशय दाट धुके पडल्यास दृश्यमानता कमी होते आणि त्यामुळे लोहमार्ग-रस्ते-हवाई वाहतूक यांवर परिणाम होतो. धुक्यामुळे अपघातही होतात.
(७) दहिवर आणि धुक्यामुळे पिकांचे नुकसान होते. तसेच दव व धुक्यामुळे रोगराई पसरते. मात्र, काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते.