नागरीकरणाची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
(१) औद्योगिकीकरण (Industrialization) : एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्य आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात. त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते.
(२) व्यापार (Trade) : एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने-आण, चढ-उतार व साठवणूक यासाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते.
(३) यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान (Mechanization and Technology) : यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान यांचे अनेक फायदे विविध क्षेत्रांत पाहावयास मिळतात. नागरीकरणासाठीदेखील हे दोन्ही घटक साहाय्यभूत ठरतात. गेल्या काही दशकांत शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यांत्रिकीकरण वाढले आहे. शेतीच्या कामातून मोकळा झालेला हा कामकरी वर्ग कामधंदयाच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाला. परिणामी नागरी लोकसंख्या वाढू लागली आहे.
(४) वाहतूक व संदेशवहन (Transport and Communication) : रस्ते, लोहमार्ग इत्यादी वाहतूक सोईंचा ज्या भागात विकास होतो, त्या भागातील छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण वेगाने घडून येते.
(५) स्थलांतर (Migration) : स्थलांतर हे बहुतांशी कायम स्वरूपाचे असते. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळेदेखील शहरातील स्थलांतरित लोकांची संख्या वाढू लागली आहे.